पीकविम्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक..भरपावसात मेहकरात निघाला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा…

SHARE

आठ दिवसात पिकविमा, नुकसान भरपाई द्या ; अन्यथा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करणार – रविकांत तुपकरांचा इशारा

मेहकर :शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पिकविमा व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज ता.२९ जुलै २०२४ रोजी मेहकर शहरात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भरपावसात या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. गेल्या वर्षीचा १००% पिकविमा व नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक मिळावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकूलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी या ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.
आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा झाली नाही व इतर मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतले नाही, तर राज्यामध्ये न भूतो न भविष्यती सरकार हादरवणारे राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. या मोर्चाला गजानन अमदाबादकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, डॉ.ऋतुजा चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव लाड यांनी संबोधित केले तर या मोर्चाला नामदेव पंतगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button