मोताळा:- तालुक्यातील सिंदखेड या गावाला आज जागतिक पर्यावरण दिनी राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण समृद्ध करणाऱ्या माझी वसुंधरा या स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मुंबई येथे भव्य समारंभात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल मानवी जीवनासाठी घातक ठरत आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण वाचविणे आणि वाढवणे महत्त्वाचे आहे. येणारे 100 वर्ष मानवी जातीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.पुढील शंभर वर्षात मानव पर्यावरण वाचवण्यासाठी कायय करणार आहे, यावरच मानवी जातीचे भविष्य ठरणार आहे.पर्यावरण वाचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांची महत्त्वाची भूमिका आहे. हीच भूमिका ओळखून राज्य शासनाने पर्यावरण विभागाच्या वतीने मागील तीन वर्षापासून माझी वसुंधरा हे अभियान राबविले जात आहेत. या अभियानांतर्गत वृक्ष लागवड जलसंवर्धन, स्वच्छ वायू, अग्नी, माती,या पंचतत्वावर काम केले जाते.या अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या स्पर्धेत सन्मानित करण्यात येते. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायत ने उत्कृष्ट काम करीत राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार आज पटकाविला आहे.यासाठी या गावाने अथक परिश्रम घेत दहा हजार पेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली आहे,उजाड माळरानावर या गावाने पौष्टिक गवताची लागवड करून मोठे कुरण क्षेत्र तयार केले आहे. सोबतच पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे मोठे काम केले आहे. या गावाने आपल्या गावात प्लास्टिक बंदी या सारखे उपक्रम राबविले आहे, या गावात ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो.या गावाने केलेल्या कामासाठी त्याचा आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.